ठाणे : येऊर, तुंगारेश्वर, कृष्णगिरी उपवन आणि तुलसी या ठाण्यातील चार अभयारण्यांमध्ये सात बिबटे आणि ३९२ चितळे असल्याचे आढळून आले आहे. १० मे रोजी बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणिप्रेमींतर्फे राबवण्यात आलेल्या वन्यजीवगणनेवेळी आढळलेल्या प्राण्यांची आकडेवारी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक मोहन नाईकवाडी यांनी जाहीर केली आहे. मे महिन्यात ज्या मोजक्या पाणवठ्यांमध्ये पाणी असते, तेथे हमखास प्राणी, पक्षी पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे सर्वाधिक चंद्रप्रकाश असलेल्या रात्री पाणवठ्यांजवळ उभारलेल्या मचाणांवर बसून प्राणिप्रेमी ही गणना करतात.
सहायक वनसंरक्षकांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, या चार अभयारण्यांमध्ये सात बिबटे, ३९२ चितळे (हरणाचा एक प्रकार), ३७ सांबरे, ३२ रानडुकरे, ८६ लंगूर वानरे, २८ रानकोंबडे, १७४ लालतोंडी माकडे, १२४ वटवाघळे, नऊ रानमांजरे, १९ मुंगसे आणि तीन मोर आहेत. या चार अभयारण्यांमधील ४६ पाणवठ्यांवर ही प्राणिगणना झाली.
रामदास आठवलेंनी घेतला बिबट्या दत्तक
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक बिबट्या वर्षभरासाठी दत्तक घेतला आहे, अशी माहितीही मोहन नाईकवाडी यांनी दिली. आठवले यांनी या आठ वर्षांच्या या बिबट्याचे भीम असे नामकरण केले असून, त्यासाठी एक लाख २० हजार रुपयांचा डीडी त्यांनी जमा केला आहे.